सोलापूर : ‘प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्या रोपट्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करावा’, असे आवाहन पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे केले.
वन व सामाजिक वनीकरण विभाग आणि रेल्वे विभाग यांच्या वतीने आठ जुलै रोजी वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे क्षेत्र स्मृती उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, रेल्वेचे सहायक विभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, उपसंचालक रवींद्र माने, विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, ‘अवेळी पडणारा पाऊस, पर्यावरणाचा ढासळता समतोल यावर वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे. वृक्षारोपणाचे अनेक फायदे आहेत. मानवी जीवन सुखकर होण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यात वनाखालील क्षेत्र अतिशय कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने एक झाड लावावे. त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करावा, त्याला वाढवावे.’
रेल्वे क्षेत्र परिसरात देशमुख यांच्यासह श्री. तांबडे-पाटील, श्री. ढाकणे, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रेल्वेच्या जमिनीवर वृक्षारोपण करण्यास परवानगी दिल्याबद्दल देशमुख यांनी रेल्वे विभागाचे आभार मानले. या वेळी उपस्थित सर्वांना वृक्ष लागवडीबाबत शपथ देण्यात आली.
या वेळी सहायक रेल्वे व्यवस्थापक व्ही. के. नागर यांनी रेल्वे विभागातर्फे मनोगत व्यक्त केले. सुवर्णा माने यांनी प्रास्ताविक केले. या वेळी रेल्वेचे शिवाजी कदम, एन. के. देशमुख, तहसिलदार विनोद रणवरे आणि मल्लिकार्जुन हायस्कूल, निर्मलाताई ठोकळ प्रशाला, इंदिरा बालक मंदिर, जैन गुरुकुल प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.